Thursday, September 29, 2011

५ मार्च १९६९ : एक पत्रक

'सत्यकथा' या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित काही 'तापसी तरुणां'नी केला. या सगळ्या साठच्या दशकातल्या गोष्टी. मराठी लोकांच्या एकूण सांस्कृतिकपणाला साचलेपणा आलाय, काही मोजक्या लोकांपुरतंच हे सगळं मर्यादित राहिलंय, तर ही कोंडी फोडूया, असं लक्षात आल्याने या लोकांनी काहीनाकाही करण्याचा प्रयत्न केला. साहित्यातून आणि यातल्या काहींनी नंतर राजकीय भूमिका घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला. आता लोक विसरूनसुद्धा गेले. मुळात अनेक गोष्टी, संदर्भ पूर्णपणे बदलूनही गेले. तूर्तास हे एक पत्रक, थोडा अंदाज येण्यासाठी-- (अजून थोडे संदर्भ इथे स्पष्ट होतील). या पत्रकात सगळीच नावं आल्येत असं नाही, त्यामुळे या पत्रकावरून कोणी अति अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू नये, या ब्लॉगची सुरुवात या पत्रकाने करणं जरा बरं वाटल्याने तसं केलंय.
***

जाहीर बोलावणे

श्री.........यांस,
आमचे येथे आमचे कृपेकरून मराठीतील उच्चभ्रू मासिकांची होळी करण्याचे घाटत आहे. या निमित्ताने सत्यकथेच्या एका अंकाची होळी केली जाईल. या प्रसंगी सुप्रसिद्ध तापसी तरुण हजर राहतील. उदाहरणार्थ विख्यात बोंबलभाड्या राजा ढाले : थोर बोंबलभिके अशोक शहाणे + भालचंद नेमाडे + रमेश रघुवंशी + एकनाथ पाटील + तुळसी परब + वसंत गुर्जर. तरी दिनांक पाच मार्च एकोणिशेएकोणसत्तर रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता खटाववाडीच्या गल्लीत इष्ट मित्र-मैत्रिणींसह उपस्थित राहून या मंगल समारंभाला शोभा आणावी.

- राजा ढाले, तुळसी परब, वसंत गुर्जर

***

हा ब्लॉग कवी तुळसी परब यांच्याविषयी काही गोष्टी एकत्र जमवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment